मुंबई - गेली
चार दशके महाराष्ट्राच्या मनामनांवर अधिराज्य गाजवणारे हिंदुहृदयसम्राट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ऊर्फ बाळ केशव ठाकरे यांचे आज (शनिवार)
वयाच्या 86 व्या
वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गेले
काही दिवस शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीत चढ-उतार होत होते. मात्र शनिवारी
दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची
माहिती त्यांच्यावर उपचार करणारे लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर डॉ.
जलील परकार यांनी दिली.
दरम्यान, शिवसेनाप्रमुखांचे पार्थिव रविवारी सकाळी सात वाजल्यापासून अंतिम दर्शनासाठी शिवाजी पार्कवर ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
गेल्या मंगळवारपासून शिवसेनाप्रमुखांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर "मातोश्री' निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे कळताच अवघ्या महाराष्ट्राला दिलासा वाटला होता. शुक्रवारीही शिवसेनाप्रमुखांची तब्येत सुधारत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र शनिवारी दुपारी त्यांच्या प्रकृतीतील सुधारणा धीमी झाली असल्याचे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले आणि पाठोपाठ दुपारपासूनच "मातोश्री'वरची लगबग वाढल्याचे दिसायला लागले. सुरवातीला राज ठाकरे हे पत्नी शर्मिलासह मातोश्रीवर दाखल झाले. त्यांच्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि पाठोपाठ भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हेसुद्धा मातोश्रीवर पोचले. मातोश्रीवरची लगबग वाढल्याचे पाहून या ठिकाणी गेले दोन ते तीन दिवस ठाण मांडून असलेल्या शिवसैनिक आणि चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती आणि घडलेही तसेच. सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान शिवसेनाप्रमुखांवर सातत्याने उपचार करणारे लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील परकार, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि दिवाकर रावते आदी नेते मातोश्रीबाहेर आले. आणि डॉ. परकार यांनी शिवसेनाप्रमुखांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती दिली. गेल्या चार दशकांचा हा झंझावात थांबल्याचे ऐकून उपस्थित शिवसेना नेते, हजारो कार्यकर्ते आणि चाहत्यांना शोक अनावर झाला होता.
शिवसैनिकांनी कोणत्याही प्रकारे संयम सुटू देऊ नये. शांतता कायम राखावी. स्वतः शिवसेनाप्रमुखांना शांतता अभिप्रेत होती. त्यामुळे कार्यकर्ते आणि चाहत्यांनीही अखेरपर्यंत संयम आणि शांतता कायम राखावी, असे आवाहनही प्रवक्ते संजय राऊत यांनी केले.